खेड : रसाळगड संवर्धनाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; निकृष्ट कामाचा आरोप

banner 468x60

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुरू असलेले संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप महाराजा प्रतिष्ठानचे सचिव तथा दुर्गसेवक प्रणव मापुस्कर यांनी केला आहे.

banner 728x90

रसाळगड हा ऐतिहासिक वारसा लाभलेला महत्त्वाचा किल्ला असून, त्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी दगडी बांधकामातील दगड निखळत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा मापुस्कर यांनी केला आहे.


ऐतिहासिक बांधकामाच्या संवर्धनासाठी चुना, गूळ, उडीद डाळ आणि पाणी यांसारख्या पारंपरिक साहित्याचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष कामात या साहित्याचा योग्य वापर होत नसल्याचा तसेच बांधकामाची अपेक्षित गुणवत्ता दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी केवळ मातीचा भराव टाकून काम उरकले जात असल्याचेही मापुस्कर यांनी म्हटले आहे.

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम करताना दर्जेदार साहित्य, पारंपरिक बांधकाम तंत्र आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा वापर होणे आवश्यक आहे. अन्यथा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही संवर्धनाचे काम टिकाऊ ठरणार नाही, अशी चिंता दुर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

रसाळगडाच्या संवर्धनासाठी खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा योग्य प्रकारे वापर होत आहे का, तसेच गडावरील बांधकामाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याची पुरातत्त्व विभागाने तातडीने पाहणी करून तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, कामाच्या दर्जाबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर संबंधित पुरातत्त्व विभागाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या आरोपांबाबत विभाग काय स्पष्टीकरण देतो आणि कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणती कार्यवाही करतो, याकडे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *