रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारा येथे सोमवारी सकाळी एक हृदयस्पर्शी आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळाले. कासवांच्या पहिल्या घरट्यातून बाहेर आलेल्या पिल्लांनी समुद्राकडे झेप घेतली. स्थानिक कासवमित्र आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.
यावर्षी किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे कासवांच्या विणीवर परिणाम झाला. बांधकामादरम्यान जेसीबीसारख्या यंत्रणांमुळे निर्माण झालेल्या कंपनांमुळे कासवे किनाऱ्याकडे अंडी घालण्यासाठी येण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत घरट्यांची संख्या कमी झाली.
तरीही कासवमित्र समीर भाटकर यांनी ग्रामस्थ, वनविभाग आणि कांदळवन कक्षाच्या सहकार्याने दोन घरटी संरक्षित करण्यात यश मिळवले. या घरट्यांपैकी एका घरट्यातून तब्बल ५० हून अधिक पिल्ले बाहेर पडली.
समीर भाटकर यांच्यासह महेश भाटकर, वेदांत देवकर आणि राजन भाटकर यांनी या पिल्लांना समुद्रकिनाऱ्यावर सोडले. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी हे मनोहारी दृश्य अनुभवले आणि कासव संवर्धन उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, स्थानिकांच्या सहभागामुळेच या पिल्लांना सुरक्षित जीवनाची सुरुवात मिळत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














