रत्नागिरी : अवघ्या एका तासात खात्यातून 5.86 लाखांचा डल्ला, रत्नागिरीत सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना

banner 468x60

रत्नागिरी शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच रत्नागिरीतील बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर शाखेतील एका खातेदाराच्या खात्यातून अवघ्या एका तासात ५ लाख ८६ हजार ९ रुपये परस्पर वळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतिनगर येथील रहिवासी धीरज अर्जुन भानुशाली यांचे बँक ऑफ इंडियाच्या मारुती मंदिर परिसरातील शाखेत बचत खाते आहे. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ ते ७.३७ या अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने सायबर पद्धतीने त्यांच्या खात्यात सेंध मारत ५,८६,००९ रुपये परस्पर हस्तांतरित केले.

ही बाब लक्षात आल्यानंतर धीरज भानुशाली यांचे मित्र व कर सल्लागार राजेश रमेश सोहनी यांनी ३१ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० चे कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेचा पुढील तपास सायबर पोलीस करीत असून, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *