रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. कुटगिरी-येडगेवाडी येथील धनगर समाजातील पाच कुटुंबांनी पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी देवरुख पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून या कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असतानाही या कुटुंबांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
कुटगिरी-येडगेवाडी येथील नागरिकांना शासकीय विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या विहिरीवरून टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचा आरोप संबंधित कुटुंबांनी केला आहे. पाईपलाईन दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वारंवार निवेदने देऊनही समस्या सुटली नसल्याने अखेर नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते आणि पाणीपुरवठ्याची समस्या कधी सुटते, याकडे कुटगिरी-येडगेवाडीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













