खेड : चार दिवस मृत्यूशी झुंज अखेर अपयशी, दुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील आंबवली येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर चार दिवस उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाला. नाऊ रामा आखाडे (वय ४२, मूळ रा. आंबवली बाऊलवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी, सध्या रा. आकृती हाइट्स, कालेखाजन खंड, ता. चिपळूण) असे मृताचे नाव आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास नाऊ आखाडे हे त्यांच्या डेस्टिनी दुचाकी (क्र. MH-08-BB-3118) वरून कामासाठी चिपळूणकडे जात होते. धनगरवाडी ते आंबवली मार्गावरील तिळाचा माळ येथील वळणावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते स्वतःच रस्त्यावर पडले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबवली येथे नेले. तेथून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर वालावलकर रुग्णालय, डेरवण (सावर्डे) येथे दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच २७ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती त्यांच्या चुलत भावाने सिताराम धोंडू आखाडे यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर खेड पोलीस ठाण्यात आमृत्यू क्रमांक ६६/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *