रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर हातखंबा परिसरात रविवारी घडलेला भीषण अपघात संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारा ठरला. लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक थेट सुमारे १५ फूट खोल जुन्या विहिरीत कोसळल्याने २५ वर्षीय चालक विशाल गोकुळ माने (रा. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की, ट्रकची केबिन पूर्णतः चिरडली गेली आणि लोखंडी सळ्या केबिनमध्ये घुसल्याने चालकाचा मृतदेह सापडण्यासाठीही प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक हातखंबा परिसरातून जात असताना त्याने सलग काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन कोसळला. ट्रक विहिरीत पडताना त्यातील जड लोखंडी सळ्या पुढे सरकल्या आणि थेट केबिनमध्ये घुसल्या. या जोरदार धडकेत केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. ट्रकमधील दोन ते तीन जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चालक विशाल माने यांचा काहीच मागमूस लागत नव्हता. ट्रकचा काही भाग विहिरीच्या पाण्यात बुडालेला होता, तर काही भाग लोखंडी सळ्यांच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला होता. त्यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
अखेर प्रशासनाने क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर रविवारी रात्री उशिरा ट्रक विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सळ्यांच्या ढिगाऱ्याखाली अत्यंत विद्रूप अवस्थेत चालक विशाल माने यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गाच्या कामातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हातखंबा परिसरात रस्त्याचे काम सुरू असतानाही त्या ठिकाणी कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. धोकादायक वळणांवर सूचना फलकांचा अभाव, योग्य डायव्हर्जनची व्यवस्था नसणे, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशयोजना नसणे आणि रेडियम स्टिकर्सचा अभाव यामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठेकेदार कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ नफ्यासाठी काम करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. योग्य वेळी आवश्यक उपाययोजना केल्या असत्या, तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सध्या या घटनेची चौकशी सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या अपघाताने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर महामार्गावरील सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर विचार करण्याची वेळ पुन्हा एकदा निर्माण केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














