रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील भिंगळोली आदिवासीवाडी येथे एका ४० वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंडणगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना हरिश्चंद्र जाधव (वय ४०, रा. भिंगळोली आदिवासीवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी दि. २३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले.
प्राथमिक माहितीनुसार, घटनेच्या वेळी त्यांचे पती हरिश्चंद्र शंकर जाधव हे वाडीत आलेला साप हाकलण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यानंतर अर्चना जाधव यांनी घरातील लोखंडी भाल्याला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने संबंधितांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आमृत्यू नोंद (A.D.) क्रमांक १४/२०२६ अंतर्गत भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.१९ वाजता नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













