देवरुख येथे गणेशोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू असताना विजेचा धक्का लागून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना देवरुखनजीकच्या सायले गावात रविवारी घडली. स्वप्निल श्रीकांत कानाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल कानाल हा रोजगारानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होता. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तो शनिवारी उत्साहात आपल्या मूळ गावी सायले येथे आला होता. कुटुंबीय व मित्रांसोबत गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
रविवारी सकाळी घरात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू होती. मखर सजावट, विद्युत रोषणाईची व्यवस्था तसेच घराची साफसफाई करण्यात येत होती. याचदरम्यान साफसफाई करत असताना स्वप्निल याला अनावधानाने विजेचा जबर धक्का बसला. धक्क्याची तीव्रता इतकी होती की तो गंभीर अवस्थेत जमिनीवर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
गणेशोत्सवाच्या आनंदासाठी मुंबईहून गावी आलेल्या तरुणाचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कानाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सायले गावावर शोककळा पसरली आहे. गणरायाच्या आगमनाच्या आनंदावर या घटनेने दुःखाचे सावट पसरले असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













