गुहागर : उमराठ ग्रामपंचायतीत माजी सैनिक दीपक जालगांवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

banner 468x60

गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक दीपक धाकू जालगांवकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, महिला मंडळी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

banner 728x90

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उमराठ गावात तीन दिवस ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय समिती सदस्या अर्चिता अनंत गावणंग, तर आरोग्य उपकेंद्रात आशा सेविका वर्षा उदय गावणंग यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत येथे प्रशासकीय सदस्य तथा माजी उपसरपंच सूरज घाडे आणि आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत येथे माजी सैनिक दीपक जालगांवकर, तर आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक यज्ञेश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उमराठ शाळा क्रमांक १ येथे मुख्याध्यापक शशिकांत दाभोळकर, सुनील वाघे, तर शाळा क्रमांक ३ येथे मुख्याध्यापक स्नेहल गोरिवले आणि वैभव वासावे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज देण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व सांगून त्याचे पावित्र्य जपण्याचे आवाहन केले.

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शाळा क्रमांक १ आणि ३ मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर घोषणा देत गावातून तिरंगा रॅली काढली. तसेच ‘एक राखी देशासाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या गावचे पोस्टमन दामोदर आंबेकर यांच्या माध्यमातून सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या.

१५ ऑगस्ट रोजी प्रमुख अतिथी माजी सैनिक दीपक जालगांवकर आणि त्यांच्या पत्नी अर्चना जालगांवकर यांचा शाळा व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापिका स्नेहल गोरिवले आणि विद्यार्थिनी जानवी यांनी दीपक जालगांवकर यांना राखी बांधून सीमेवरील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही देशभक्तिपर भाषणे सादर केली. माजी सैनिक दीपक जालगांवकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन सावंत व त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना जिलेबी देण्यात आली. आरोग्य उपकेंद्राच्या वतीनेही विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे, शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक शशिकांत दाभोळकर, उपशिक्षक सुनील वाघे, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, आशा सेविका वर्षा गावणंग व मैथिली पावसकर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक यज्ञेश कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन सावंत, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार, नवलाई देवस्थानचे अध्यक्ष अनिल पवार, विविध वाडी अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, महिला मंडळी तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी मुख्याध्यापक शशिकांत दाभोळकर आणि सुनील वाघे यांनी विद्यार्थ्यांमधून माजी सैनिक दीपक जालगांवकर यांच्यासारखे देशसेवेसाठी योगदान देणारे ‘हिरे’ घडविण्यासाठी ग्रामस्थांनी यापुढेही शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन केले. उपस्थितांचे आभार मानत ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा उत्साहात समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *