कोळथरे येथे कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या पुढाकाराने आंबा-काजू पिकांच्या नुकसानभरपाईसाठी आवश्यक e-KYC तसेच प्रधानमंत्री पिकविमा योजनेच्या नोंदणीचे विशेष शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

कोकणात झालेल्या आंबा व काजू पिकांच्या नुकसानीनंतर शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. मात्र ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. ही अडचण लक्षात घेऊन कृषी विभागाच्या सहकार्याने कोळथरे येथील आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर प्रशाला येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन, कृषी विभागीय अधिकारी मंचरे, जाधव, विद्याधर जोशी, ओंकार कात्रे, कौस्तुभ वैद्य, आदित्य देपोलकर, सिद्धी मयेकर, सुनील पेठे, अमेय हुंबरे, शाळेचे मुख्याध्यापक मंगेश नरवणकर, प्रशांत जाधव तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोळथरे, पंचनदी, गोमराई, आघारी, उसगाव, बोरिवली आदी गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या साधना महाजन यांनी सांगितले की, आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलेली नुकसानभरपाई ही त्यांच्या अडचणीच्या काळातील मोठी मदत असून, महायुती सरकार कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशीलतेने कार्य करत असल्याचे या उपक्रमातून दिसून येते. वर्षभर मेहनत करूनही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













