चिखलगाव : वीज समस्यांवर गृहमंत्री योगेश कदम यांची निर्णायक बैठक, महावितरणला तातडीच्या कामांचे आदेश

banner 468x60

दापोली | प्रतिनिधी : सागर गोवळे दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे पंचनदी महावितरण उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्माण कॉलेज, चिखलगाव येथे विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महावितरणच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

banner 728x90

बैठकीत गृहमंत्री योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत, “नागरिक वेळेवर वीज बिल भरत असताना त्यांना अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा का मिळत नाही?” असा सवाल उपस्थित केला. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करत, रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दापोली मतदारसंघासाठी ५० नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तसेच, दाट जंगल आणि दुर्गम भागातून जाणाऱ्या धोकादायक वीजवाहिन्या टप्प्याटप्प्याने रस्त्यालगत स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ प्रभावीपणे राबवून अधिकाधिक नागरिकांना सौरऊर्जेशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणवरील भार कमी होऊन ग्राहकांना दीर्घकालीन दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या शेवटी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून वीज ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात आणि वीजपुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश गृहमंत्री योगेश कदम यांनी दिले.

या बैठकीनंतर दापोली तालुक्यातील वीज समस्यांवर ठोस आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *