रत्नागिरी : पत्नीसोबतच्या वादानंतर २६ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, धामणसे चौकेवाडीत हळहळ

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथे एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादानंतर ही टोकाची पावले उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन नारायण कळंबटे (वय २६, रा. धामणसे चौकेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार (२५ जुलै) रोजी सकाळच्या सुमारास नितीन याचा पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर तो मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर दुपारी सुमारे २.३० ते २.४५ वाजण्याच्या दरम्यान त्याने राहत्या घरातील खोलीत लाकडी वाश्याला नायलॉन साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

काही वेळाने नातेवाईकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अवघ्या २६ वर्षीय तरुणाच्या अकाली निधनामुळे धामणसे चौकेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *