रत्नागिरी-बोरिवली एसटीचा चाफे-कातळवाडीत अपघात, एक प्रवासी जखमी

banner 468x60

रत्नागिरीहून बोरिवलीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा चाफे-कातळवाडी परिसरात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने हा अपघात झाला असून, यात एका प्रवाशाला दुखापत झाली आहे. सुदैवाने बसमधील इतर सर्व प्रवासी सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२० बीएल २९४५ क्रमांकाची रत्नागिरी-बोरिवली एसटी बस शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता रत्नागिरी आगारातून बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चाफे-कातळवाडी परिसरातून जात असताना अचानक एक गाय रस्त्यावर आली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावरील नियंत्रण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाय वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला.

अपघात होताच बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने उपचारासाठी जाकादेवी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातात बससमोर आलेली गायही जखमी झाली आहे. स्थानिकांनी तिची देखील काळजी घेत संबंधितांना याबाबत माहिती दिली. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, स्थानिकांच्या मदतीने परिस्थिती लवकरच सुरळीत करण्यात आली.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः पहाटे आणि सकाळच्या वेळेत रस्त्यावर अचानक जनावरे आल्यामुळे वाहनचालकांसमोर अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवासी आणि स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *