राजापूर : विहिरीच्या पाण्यावरून वाद आणि मारहाण, सख्ख्या भावासह वहिनीविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

banner 468x60

राजापूर तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात रवींद्र यशवंत खानविलकर (वय ५६) हे जखमी झाले असून, त्यांच्या सख्ख्या भावासह वहिनीविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र खानविलकर यांनी स्वतः बांधलेली विहीर त्यांच्या मालकीची असून, त्या विहिरीचे पाणी त्यांचे सख्खे भाऊ मोहन खानविलकर आणि वहिनी सुवर्णा खानविलकर हे आपल्या घराच्या बांधकामासाठी वापरत होते. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता.

२ मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजता रवींद्र खानविलकर यांनी अंगणात येऊन विहिरीचे पाणी वापरण्यास विरोध केला. त्यांनी याबाबत मनाई केल्यानंतर वाद आणखी चिघळला. याच रागातून आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.


या हल्ल्यात आरोपी मोहन यशवंत खानविलकर (वय ६५) याने हातातील लोखंडी कटावणीने रवींद्र यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या प्रहारामुळे ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी आरोपी सुवर्णा मोहन खानविलकर (वय ५५) हिने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर तसेच डाव्या हातावर मारहाण केली.

हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत “तुझा जीवच घेतो” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर रवींद्र यांच्या मोबाईल फोनवर दगड मारून त्याचेही नुकसान करण्यात आले.

घटनेनंतर जखमी अवस्थेत रवींद्र खानविलकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५१(१), ३५२, ३२४(४)(५) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.

सध्या राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कौटुंबिक वादातून झालेल्या या हिंसक घटनेमुळे तेरवण थोरलीवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *