रत्नागिरी जिल्ह्यातील आरे-वारे समुद्रकिनारा येथे रविवारी (२९ मार्च) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या तरुणाचा स्थानिकांच्या धाडसामुळे जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर आले होते. सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास कुटुंबातील काही सदस्य समुद्रात उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघेही ओहोटीच्या तीव्र प्रवाहात अडकले आणि बुडू लागले.
घटनेची चाहूल लागताच किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतली.
पोलीस पाटील आदेश कदम यांनीही क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांना वाचवण्यात अपयश आले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पर्यटकांना समुद्रात उतरताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आरे-वारेसारख्या किनाऱ्यांवर पाण्याचे प्रवाह अचानक बदलू शकतात, त्यामुळे सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













