यंदाच्या हंगामात अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील २८ हजार ९७५ शेतकरी बाधित झाले असून सुमारे ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील आंबा व काजू बागांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
लहरी हवामानामुळे आंबा व काजू पिकांवर वारंवार फळधारणा झाली; मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फळगळ झाल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादनाच्या केवळ २० ते ३० टक्केच उत्पन्न मिळाले. शासनाच्या आदेशानुसार तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, भरपाईच्या निकषांवरून शेतकरी आणि बागायतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्याच्या शासकीय नियमांनुसार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची मदत दिली जाते. मात्र ही मदत केवळ दोन हेक्टर क्षेत्रापुरती मर्यादित असल्याने ती अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बागायतदारांच्या मते आंबा पिकातून हेक्टरी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान आणि शासनाकडून मिळणारी मदत यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप होत आहे. भरपाईची रक्कम वाढविण्यासह दोन हेक्टरची मर्यादा रद्द किंवा शिथिल करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
जिल्हा कृषी विभागाने प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट केले असून येत्या काही दिवसांत शासनाकडे सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर नुकसानभरपाईबाबतचा अंतिम निर्णय होणार असून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













