प्रतिनिधी : सागर गोवळे
दापोली तालुक्यातील महाडिक स्टॉप ते कोळथरे या प्रमुख मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून झालेली दुरवस्था अखेर प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या गंभीर परिस्थितीचे वृत्त ‘कोकण कट्टा न्यूज’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

महाडिक स्टॉप ते कोळथरे हा मार्ग स्थानिक नागरिकांसह नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच पर्यटकांसाठी महत्त्वाचा आहे. मात्र, पावसामुळे या रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली होती. अनेक ठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांना खड्डे चुकवत मार्गक्रमण करावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावण्याबरोबरच अपघाताचा धोका देखील वाढला होता.

खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे अनेकदा वाहनचालकांचा अंदाज चुकत होता. चारचाकी वाहनांनाही या खड्ड्यांचा मोठा फटका बसत असून, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत होत्या.

या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र, परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती.

दरम्यान, ‘कोकण कट्टा न्यूज’ने या रस्त्यावरील खड्ड्यांचे वास्तव समोर आणत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रवाशांना होणारा त्रास, वाहनांचे नुकसान आणि संभाव्य अपघाताचा धोका याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तातून नागरिकांच्या समस्या आणि रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनापुढे मांडण्यात आली.
या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने अखेर हालचाली सुरू केल्या असून, गेल्या दोन दिवसांपासून महाडिक स्टॉप ते कोळथरे मार्गावरील मोठे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, केवळ खड्डे बुजवून प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नसून, रस्त्याची दर्जेदार आणि टिकाऊ डागडुजी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पावसाळ्यात पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडू नयेत, यासाठी कामाच्या गुणवत्तेकडे संबंधित विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे.
‘कोकण कट्टा न्यूज’च्या वृत्तामुळे नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फुटली आणि प्रशासनाने तातडीने दखल घेतली, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत असून, पुढील काळातही रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी संबंधित विभागाने सातत्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













