Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : अवकाळी पावसाचा फटका; रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शाळांचे नुकसान, 76 शाळांची होणार दुरुस्ती

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे आणि वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच शासकीय मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका शिक्षण विभागालाही बसला असून लांजा तालुक्यातील दोन आणि चिपळूण तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे.

banner 728x90

दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. येत्या १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याने शिक्षण विभागाने शाळांची दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजनाला वेग दिला आहे. मागील दोन दिवस झालेल्या वळवाच्या पावसामुळे काही शाळांच्या इमारतींच्या छतावरील पत्रे उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी कौलारू भाग कोसळल्याने वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय खिडक्या तुटणे, पावसाचे पाणी वर्गात शिरणे अशा प्रकारच्या घटनाही घडल्या आहेत.

प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसानग्रस्त शाळांचे प्रस्ताव संबंधित प्रशासनाकडून प्राप्त होताच दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत. जूनपूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्राधान्याने दुरुस्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची अवस्था आधीपासूनच जीर्ण झाली असून त्यासाठी व्यापक दुरुस्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ७६ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये छत दुरुस्ती, भिंतींची मजबुतीकरण कामे, खिडक्या-दरवाजे बदलणे तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आणखी काही शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास त्यांचाही समावेश दुरुस्ती योजनेत केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पावसाळा तोंडावर असताना जिल्ह्यातील शाळांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *