रत्नागिरी : पाली-माईनवाडीत बंद बंगल्याची खिडकी फोडून घरफोडी

banner 468x60

रत्नागिरी शहरालगतच्या पाली-माईनवाडी परिसरात बंद बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सॅमसंग कंपनीचा ५५ इंची एलईडी टीव्ही तसेच तांब्याच्या विविध वस्तू असा सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घरफोडी ३० ऑगस्ट रोजी रात्री ७.३० ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० या कालावधीत घडली. पाली-माईनवाडी येथे सुरेंद्र सखाराम सावंत यांचा बंगला असून तो बंद होता. घरातील सर्व दरवाजांना कुलपे लावलेली असतानाही अज्ञात चोरट्याने समोरील खिडकीचे लोखंडी ग्रील काढून खिडकीतून घरात प्रवेश केला.

घरात शिरल्यानंतर चोरट्याने सुमारे १५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा ५५ इंची फ्लॅट टीव्ही, तांब्याच्या पट्ट्या, तांब्याचे कप-बादल्या, तांब्याची मूत्रपात्रे तसेच जुना टेपरेकॉर्डर आदी साहित्य लंपास केले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १७ हजार रुपये आहे.

या प्रकरणी शांताराम विश्राम मांडवकर (वय ६०, रा. पाली-माईनवाडी, रत्नागिरी) यांनी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १८५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घरफोडीचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *