रत्नागिरी : जिल्ह्यात 1.31 लाख मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली, 30 सप्टेंबरपर्यंत हरकतीची संधी

banner 468x60

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पुनरीक्षण प्रक्रियेत तब्बल १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, याची तातडीने पडताळणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

१ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक धरून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा अन्य तपशीलात त्रुटी असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन पद्धतीनेही मतदारांना आपले नाव तपासता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल.

दावे-हरकतींसाठी नमुने :

  • नमुना क्र. ६ – नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी
  • नमुना क्र. ७ – नावावर आक्षेप / नाव वगळण्यासाठी
  • नमुना क्र. ८ – नावातील दुरुस्ती / पत्ता बदल

हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा BLO यांच्याकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील.

प्रशासनाचे आवाहन : “प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, तसेच नाव व पत्ता यासह सर्व तपशील योग्य आहेत का, याची प्रत्येक मतदाराने खातरजमा करून घ्यावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *