खेड : सुरक्षेच्या कारणास्तव रघुवीर घाट 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद

banner 468x60

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा तसेच जीवितहानीचा धोका लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

banner 728x90

प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील रघुवीर घाटात साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली असून कि.मी. १००/५०० ते १०५/५०० या दरम्यान डांबरी रस्ता आणि साईडपट्टी खचली आहे. तसेच रस्त्यावर माती व दगड साचल्याने डांबरी पृष्ठभागाला तडे गेले असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील पर्यटनावर तात्पुरती बंदी घातली आहे.

आदेशानुसार केवळ पुढील वाहनांनाच परवानगी असेल :

अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसेस

पुढील वाहनांना व पर्यटकांना बंदी :

सर्व प्रकारची जड वाहने
इतर सर्व खासगी वाहने
घाटातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी थांबण्यास व पर्यटनासाठी प्रवेश करण्यास पूर्णतः मनाई

नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *