खेड : पिरलोटे येथे ‘शतायु क्लिनिक अॅण्ड पंचकर्म सेंटर’चे दिमाखदार उद्घाटन; ग्रामीण भागाला दर्जेदार आरोग्यसेवेची नवी दिशा

banner 468x60

खेड तालुक्यातील पिरलोटे येथील संतकृपा संकुलामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘शतायु क्लिनिक अॅण्ड पंचकर्म सेंटर’चा उद्घाटन सोहळा शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ग्रामीण भागातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म सेवा आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे परिसरातून स्वागत करण्यात आले.

banner 728x90

उद्घाटन समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, एम.ई.एस. पुणेचे डायरेक्टर ऑफ रिलेशन्स डॉ. शामसुंदर भाकरे तसेच प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. रामेश्वर गौंड यांची उपस्थिती. त्यांच्या शुभहस्ते क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, जाई आंग्रे, पंचायत समिती सदस्य अजय चाळके, रेवती घाग, उपसभापती डॉ. नितीन शिंदे, तसेच घाणेखुंट, भेलसई, सोनगाव, आवाशी, लोटे, धामणदिवी, चिरणी आदी ग्रामपंचायतींचे सरपंच आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी ग्रामीण भागात आधुनिक आरोग्यसेवेसोबत आयुर्वेदिक उपचारपद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणारे आजार, ताणतणाव आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता पंचकर्मसारख्या पारंपरिक उपचारपद्धती लोकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या केंद्रामार्फत आयुर्वेदिक सल्ला, पंचकर्म उपचार, आरोग्य तपासणी तसेच विविध आजारांवरील समुपदेशन आणि उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लोटे, पिरलोटे, घाणेखुंट, धामणदिवी, सोनगाव, आवाशी, चिरणी, भेलसई, शेल्डी आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना उपचारांसाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

उद्घाटन सोहळ्यास विविध शाखांतील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांनीही उपस्थिती लावली. यामध्ये आयुर्वेद, स्त्रीरोग, मेडिसिन, पॅथॉलॉजी आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांचा समावेश होता. उपस्थित तज्ज्ञांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी नव्या आरोग्य केंद्राचे स्वागत करत परिसरात आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त केली. उद्घाटनानंतर मान्यवरांनी क्लिनिकची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ह.भ.प. सखाराम महाराज नोवळकर, ह.भ.प. महेंद्र सखाराम गोवळकर, ह.भ.प. मकरंद महेंद्र गोवळकर, डॉ. रोशनी मच्छिंद्र गोवळकर आणि डॉ. मच्छिंद्र महेंद्र गोवळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच गणेश प्रासादिक मंडळ आणि महिला मंडळ, लोटे-दिक्षितवाडी यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘शतायु क्लिनिक अॅण्ड पंचकर्म सेंटर’ची स्थापना महत्त्वपूर्ण ठरणार असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *