मंडणगड : तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, आंबा-काजू बागायतींसह घरांचे मोठे नुकसान

banner 468x60

मंडणगड : तालुक्यात शुक्रवारी (दि. ९ मे) झालेल्या अवकाळी तुफानी वाऱ्यासह वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले असून झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

विशेषतः कोंडगाव, दंडनगरी, पणदेरी आणि पेवे परिसरात आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांवरील तयार आंबा फळे तुफानी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडली असून अनेक झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत. काही ठिकाणी काजू झाडांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वादळी पावसामुळे काही भागातील घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले असून नागरिकांचेही मोठे हाल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून आंबा-काजू पिकांचे, मोडलेल्या झाडांचे तसेच घरांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनामार्फत नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *