कोकणात आलेला मान्सून पुढे का सरकत नाहीये?

banner 468x60

४ जून रोजी केरळात पोहोचलेल्या मान्सून दोनच दिवसांत कोकण गाठले. संपूर्ण कर्नाटक व्यापून टाकला, पण नंतर पावसांचा वेग मंदावला. गेल्या चार दिवसांपासून मान्सून कोकणातून पुढे सरकलेला नाही. मान्सून संथ होण्यामागे काही हवामानातील बद्दल कारणीभूत आहेत. याबद्दलची स्कायमेट वेदरने कारणेही सांगितली आहे.

banner 728x90

यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील परिस्थिती! मान्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सून अरबी समुद्रातून पश्चिम किनारपट्टीने वेगाने पुढे सरकला आणि वेळेच्या आधी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्गपर्यंत पोहोचला. याच काळात मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटक  किनारीपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि रायलसीमाचा काही भागही व्यापून टाकला. ईशान्य भारतातही मान्सूनने चांगली प्रगती केली असून, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा तसेच अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या पूर्व भागांपर्यंत पोहोचला आहे.

पश्चिम घाटाच्या भागात मान्सूनच्या हालचाली चांगल्या असल्या, तरी तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या अंतर्गत भागांत त्याचा वेग मंदावला. यामुळेच जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा २२ टक्क्यांनी कमी पडला आहे.  स्कायमेटच्या रिपोर्टनुसार, पुढील काही दिवसांत मान्सून कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत पुढे सरकू शकतो. पण, सामान्यतः कोणत्याही भागात मान्सून पुढे जाण्यापूर्वी २ ते ३ दिवस मध्यम स्वरूपाच्या मान्सूनपूर्व (प्री-मान्सून) हालचाली पाहायला मिळतात. या वेळी असे वातावरण अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले आहेत.

केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पाऊस होऊनही दक्षिण भारताच्या अंतर्गत भागांत पाऊस कमी झाल्यामुळे मान्सूनची स्थिती तितकीशी मजबूत दिसत नाही. एकूणच आतापर्यंतच्या परिस्थितीवरून असे समोर आले आहे की, मान्सूनची प्रगती तर झालीये, मात्र मुसळधार मान्सून पाऊस होण्याची स्थिती अजून पूर्णपणे सक्रिय झालेली नाही. स्कायमेटच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, केरळमध्ये मान्सूनचे आगमन मुख्यत्वे अरबी समुद्रातून येणाऱ्या शाखेच्या प्रभावामुळे होते.

परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मान्सून सक्रिय झाल्याची परिस्थिती निर्माण होण्यासाठी बंगालच्या उपसागरात प्रभावी कमी दाबाचा पट्टा (चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होणे) तयार होणे अत्यंत आवश्यक असते.  सध्या बंगालच्या खाडीत अशी कोणतीही मजबूत चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होण्याचे संकेत नाहीत, ज्यामुळे मान्सूनचा वेग दक्षिण आणि मध्य भारताकडे वाढवू शकेल.

मात्र, १० आणि ११ जून दरम्यान कोकण किनारपट्टीपासून ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारीपट्टीपर्यंत म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशवर एक पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

त्याच्या दोन्ही बाजूंना मान्सूनपूर्व पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याला मान्सूनचा पाऊस मानले जाणार नसल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत मान्सून पुढे नेण्यासाठी एका नवीन आणि मजबूत मान्सूनच्या टप्प्याची आवश्यकता लागणार आहे. 

कमी दाबाचा पट्टा तयार होणे आवश्यक

जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात सरासरी दैनंदिन पाऊस सुमारे ३ मिमी, दुसऱ्या आठवड्यात ४ मिमी आणि महिन्याच्या मध्यापासून पुढे ५ मिमी किंवा त्याहून अधिक होतो. देशात दररोज ५ ते ६ मिमी पावसाच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी मान्सून सक्रिय झाल्याची परिस्थिती आवश्यक आहे. त्यासाठी मान्सूनला वेळेनुसार पुढे नेण्यासाठी बंगालच्या उपसागरात एक प्रभावी हवामान प्रणाली म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होणे अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *