दापोली : शिवसेनेला धक्का, वणंदमधील 200 ते 250 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

banner 468x60

दापोली तालुक्यातील वणंद गावातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे 200 ते 250 कार्यकर्त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि केदार साठे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दापोलीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, “मतदारसंघाला मालकी समजणाऱ्या नेतृत्वाला धडा शिकवा,” असे आवाहन दापोली भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही यावेळी खोचक शब्दांत टीका केली. “मनिऑर्डर घेऊन येणाऱ्या पोस्टमनने ‘मी पैसे देतो’ असं वागू नये…” असा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना टोला लगावला आहे.

तर माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना, “कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान फक्त भाजपमध्येच जपला जातो,” असे प्रतिपादन केले.

वणंद गावातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकाचवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दापोलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी काळातील दापोलीतील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *