रत्नागिरी : आरे येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी आरे पाखाडी येथील कालभैरव मंदिरासमोर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेला मारहाण केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आनंद पेडणेकर (वय ५०, रा. मयेकरवाडी, आरे) या ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दळण आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी कालभैरव मंदिराजवळ मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्या तेथे गेल्या. यावेळी प्रसाद कदम, पंकज कदम, दुर्वाक कदम, रक्षदा पंकज कदम आणि दिपाली कदम यांच्या कुटुंबीयांमध्ये भांडण सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

भांडण सुरू असताना आरोपी प्रसाद कदम याच्या हातात लादी असल्याचे फिर्यादीने पाहिले. त्यामुळे भांडण सोडवण्यासाठी अस्मिता पेडणेकर या मध्ये गेल्या. त्यावेळी प्रसाद कदम आणि पंकज कदम यांनी, “तू का येथे आलीस, तुझा काय संबंध?” असे म्हणत त्यांना छातीवर व हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेप्रकरणी अस्मिता पेडणेकर यांनी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक २०४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *