शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी चिपळूण मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र (emotional letter) लिहलं आहे.
या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव हे उद्या (10 मार्च) सकाळी 11 वाजता चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींवर भास्कर जाधव प्रकाश टाकणार आहेत.
मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये कार्यकर्त्यांना आपली भूमिका भास्कर जाधव पटवून देऊन मनमोकळे करणार असल्याचं या पत्रातून त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकमेकांवरील टीकेला कोकणी धार आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी गुहागरमध्ये सभा घेत भास्कर जाधव यांच्यावर अत्यंत आक्रमक टीका केली होती. त्यानंतर आठवड्यापूर्वी शिवसेनेचे रामदास कदम यांनीही भास्कर जाधव यांच्यावर टीकेचा आसूड ओढला होता.
त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा गुहागरमध्ये सुनील तटकरे आणि रामदास कदम यांची एकत्र सभा भास्कर जाधव यांच्याच मतदारसंघात म्हणजे गुहागरमध्ये होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांची एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे.
भास्कर जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटते.
अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात असे भास्कर जाधवांनी पत्रात म्हटलं आहे.
शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही
तुम्ही सर्वांनी मला साथ दिली आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रुपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय.
अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.
या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळं मी यशाची अनेक शिखर पार करु शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय. शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचाय
मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे.
पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो,
तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया. मी आपली वाट पाहतोय..!! असं या पत्रात भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















