रत्नागिरी : बंद बंगल्याला चोरट्यांचे लक्ष्य, कुलूप तोडून चोरी

banner 468x60

रत्नागिरी येथील खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगर परिसरातील बंद बंगल्याचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत पितळी व तांब्याच्या भांड्यांसह बाथरूममधील मिक्सर, नळ, कपडे आणि चार्जिंग बॅटरी असा सुमारे २१ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६.२० वाजल्यापासून ते १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सेवानिवृत्त विनोद गणपत विचारे (वय ६२) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विचारे यांच्या मालकीचा कृष्णकुंज बंगला लक्ष्मी-नारायण नगर, खेडशी येथे असून, सध्या ते मुंबईतील डोंबिवली पश्चिम येथे वास्तव्यास असल्याने हा बंगला बंद होता.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या पुढील दरवाजाचे कुलूप आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील विविध वस्तू चोरीच्या इराद्याने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चोरी गेलेल्या ऐवजामध्ये २०० रुपयांची चार्जिंग बॅटरी, सुमारे २ हजार रुपयांचे पितळी साहित्य असून त्यात एक समई व सात मोठ्या पितळी भांड्यांचा समावेश आहे. तसेच ९ हजार २०० रुपयांची तांब्याची भांडी चोरीला गेली असून त्यात तीन तांबे, दोन ताम्हाणे, एक पेला आणि एक पळीपात्राचा समावेश आहे.

याशिवाय ५०० रुपयांचा अल्युमिनियमचा डबा, ७ हजार रुपयांचे बाथरूममधील दोन मिक्सर व तीन नळ, तसेच २ हजार ५०० रुपयांचे वापरते कपडे आणि आठ साड्या असा ऐवजही चोरट्याने लंपास केला आहे. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत २१ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६ अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बंद बंगल्याला लक्ष्य करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *