आम्ही शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली आणि आशीर्वाद मागितले.
साहेबांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही; परंतु अद्याप महायुतीचे कोणतेही सूत्र ठरलेले नाही, असं स्पष्ट मत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केलं.
महायुती म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जायचे एवढे नक्की झाले आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढल्या जातील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अजूनही निश्चिती नाही. पावसाळ्यानंतर महायुती मैदानात उतरेल, अशी प्रतिक्रियाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
जिल्हा नियोजनच्या बैठकीनिमित्त कालपासून रत्नागिरी दौऱ्यावर असलेले तटकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यांमध्ये अनेक योजना आणण्याचे सामुदायिक प्रयत्न सुरू आहेत.
उद्योगक्षेत्र, इतर पायाभूत सुविधा असेल यामध्ये प्रगतिपथावरती नेण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर निवडणुका केव्हा होतील त्या बाबतीमध्ये स्पष्ट होईल.
आता लोकसभेमध्ये जिल्हा, तालुकास्तरावर, विधानसभा क्षेत्रनिहाय, पक्षाची समन्वय समिती नेमावी आणि गावपातळीपासून ते राज्यपातळी तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे.
जनतेची कार्यकर्त्यांची जरूर इच्छा आहे की, एकत्र राहावे; पण आम्हाला सर्वांना वास्तवतेचे भान आहे. आज महायुतीमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत.
त्यामुळे एकत्रितपणे काम करणे, हे आमच्या सर्वांच्या समोरचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. आज मुख्यमंत्री बदलाचा विषय अजिबात नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपापला पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेवरती राहणार आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेवरती नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहणार. आमचे सर्व संघटन युवा, युवती, महिला इतर जे आमचे सेल्स आहेत ते आम्ही कार्यरत करत आहोत.
परंतु, निवडणुकांना मात्र महायुती म्हणून आम्ही सामोरे जाण्याचे नक्की केले आहे. रत्नागिरी दौरा केल्यानतंर चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आम्हाला चांगला पाठिंबा मिळत आहे. एकत्रित तिन्ही पक्षाला आगामी निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळेल हा सर्वांना विश्वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणामध्ये देवगडचे आमदार आप्पासाहेब गोगटे किंवा त्यांचे चिरंजीव, रत्नागिरीतसुद्धा कुसुमताई अभ्यंकर, शिवाजीराव गोताड, बाळ माने, तात्यासाहेब नातू, डॉ. विनय नातू यांच्यामुळे भाजपचे अस्तित्व होते. नंतरच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने ते कदाचित कमी झाले असेल;
पण आजही नारायण राणेंच्या प्रवेशाच्यानंतर कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व वाढले. रवींद्र चव्हाण एक उत्तम संघटक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये किंवा शिवसेनेमध्ये फूट पाडून भारतीय जनता पक्ष स्वतःला वाढवते, असे मला वाटत नाही, असे तटकरे यानी सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*