दापोली : स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिला होणार उद्योजिका, ‘कृषी संगिनी’ समूहाकडून यशस्वी मार्गदर्शन

banner 468x60

साखळोली (प्रतिनिधी : सागर गोवळे): ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी आणि उद्योजक बनवण्याच्या उद्देशाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या ‘कृषी संगिनी’ समूहाने ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला. या माध्यमातून गावातील विविध स्वयं-सहाय्यता बचत गटांतील महिलांना उद्योजकतेचे मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन सत्रात महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, लघुउद्योग उभारणी आणि व्यवसाय व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची माहिती देण्यात आली.

उद्योजकतेचा पाया : मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

या कार्यशाळेत महिलांना शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड कशी करावी, कमी भांडवलात उद्योगाची सुरुवात कशी करता येईल, तसेच व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन आर्थिक स्वावलंबन साध्य करता येते. सामूहिक प्रयत्न, योग्य नियोजन आणि उपलब्ध संधींचा वापर केल्यास महिला यशस्वी उद्योजिका बनू शकतात, याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

स्थानिक संसाधनांतून समृद्धीचा मार्ग

महिलांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य वापर करून मूल्यवर्धित कृषी उत्पादने, अन्नप्रक्रिया उद्योग, घरगुती व्यवसाय तसेच पूरक उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

उत्पादनाची गुणवत्ता, व्यवसायाचे नियोजन आणि प्रभावी विपणन (मार्केटिंग) या तीन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केल्यास व्यवसायात यश मिळू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

‘कृषी संगिनी’ समूहाच्या या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये उद्योजकतेबाबत उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला. अनेक महिलांनी भविष्यात स्वतःचे लघुउद्योग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली असून, अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाचे आयोजन ‘कृषी संगिनी’ समूहातील वैभवी देसाई, सलोनी माने, मृदुला मुळे, आर्या निकम, आर्या पाटील, तेजस्विनी पाटील, अपूर्वा साबळे, अर्पिता राज, रितू सिनवार आणि कर्मा सोलंकी यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ आणि महिलांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *