मंडणगड : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मंडणगड तालुक्याला तब्बल 1 कोटी 41 लाखांहून अधिक नुकसान

banner 468x60

मंडणगड तालुक्यात ९ मे २०२६ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, गुरांचे गोठे, सार्वजनिक मालमत्ता तसेच वीज यंत्रणांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

banner 728x90

तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक ११ मे २०२६ अखेर महसूल विभागाने एकूण १ कोटी ४१ लाख ९३ हजार ३०० रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. मात्र, अनेक भागांतील पाहणी अद्याप सुरू असल्याने या नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, मंडणगड महसूल मंडळात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या भागात तब्बल ३२० घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याची रक्कम ३७ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय २३ गुरांच्या गोठ्यांचे २ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच १३ सार्वजनिक मालमत्तांचे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या मंडळातील एकूण नुकसान ४१ लाख ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

म्हाप्रळ महसूल मंडळातही वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागात ६० घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्यासाठी ६ लाख १८ हजार रुपयांची नोंद करण्यात आली आहे. दोन गुरांच्या गोठ्यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून एका सार्वजनिक मालमत्तेचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मंडळातील एकूण नुकसान ६ लाख ४६ हजार ८०० रुपये इतके झाले आहे.

तर देव्हारे महसूल मंडळात १५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याची किंमत ४ लाख ७२ हजार रुपये इतकी आहे. एका गुरांच्या गोठ्याचे ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले असून या मंडळातील एकूण नुकसान ४ लाख ७६ हजार ५०० रुपये इतके नोंदविण्यात आले आहे.

तालुकाभरात एकूण ३९५ घरांचे, २६ गुरांच्या गोठ्यांचे तसेच १४ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. या सार्वजनिक मालमत्तांमध्ये ४ शाळा, ४ अंगणवाड्या आणि ६ स्मशानभूमींचा समावेश असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणलाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या ११० मुख्य वीजवाहिनी पोलचे सुमारे ४३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच १५० लघुदाब वीज पोलचे ३९ लाख रुपये आणि ४ ट्रान्सफॉर्मरचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, वीज यंत्रणेचे एकूण नुकसान ८९ लाख रुपये इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वादळी पावसामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. महसूल विभाग, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू असून नागरिकांना आवश्यक मदत देण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *