उन्हाळ्याचा वाढता तडाखा लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एप्रिल महिन्यातच एकत्रितपणे वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना वारंवार रेशन दुकानांवर जावे लागणार नाही आणि उन्हात होणारी गैरसोय टळणार आहे.
सध्या राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, रेशन दुकानांबाहेर तासन्तास रांगेत उभे राहणे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत होते. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने वितरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा निर्णय अमलात आणला आहे.
या योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना (AAY) लाभार्थ्यांना प्रति कार्ड १०५ किलो धान्य तीन महिन्यांसाठी एकत्रित दिले जाणार आहे, तर प्राधान्य कुटुंब (PHH) गटातील प्रत्येक सदस्याला १५ किलो धान्य मिळणार आहे. धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देणे बंधनकारक राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण १८,१९६.८० मेट्रिक टन धान्य मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये १०,८३३.४५ मेट्रिक टन तांदूळ आणि ७,३६३.३५ मेट्रिक टन गहू यांचा समावेश आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे उन्हाळ्यातील त्रास कमी होऊन हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी धान्य साठवण्याची सोयही होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













