चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या किरकोळ अपघाताचे रूपांतर थेट अपहरण आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी मुंबईतील चौघांविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश मारुती शिंगरे (वय २०) हा ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे सहा वाजता सावर्डे बाजारपेठेतून जात असताना त्याच्या गाडीचा आरोपींच्या वाहनाशी अपघात झाला. या अपघातात आरोपींच्या गाडीचे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी सिद्धेशला जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतले आणि नुकसानभरपाई मिळेपर्यंत सोडणार नसल्याची धमकी दिली.
यानंतर आरोपींनी सिद्धेशला डांबून ठेवत त्याच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी सुरू केली. फिर्यादी मेघा मारुती शिंगरे (रा. कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी टप्प्याटप्प्याने १८ हजार आणि २५ हजार रुपये रोख स्वीकारले. मात्र एवढ्यावर समाधान न मानता, “आणखी १ लाख २५ हजार रुपये दिल्याशिवाय मुलाला सोडणार नाही,” अशी धमकी देत सिद्धेशला बंदी बनवून ठेवले.
या प्रकरणी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड आणि विनोद टक्के (सर्व रा. मुंबई) यांच्याविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), १४२, १२६, १२७(३), १४० आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ एप्रिल रोजी मध्यरात्री १:१५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी सिद्धेशच्या सुटकेसाठी आणि आरोपींच्या अटकेसाठी तपासाला वेग दिला आहे. या घटनेमुळे सावर्डे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













