रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे मृतदेह आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. मेघी गावकरवाडी येथे विहिरीत पडून एका नर बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले, तर तुरळ हारेकरवाडी परिसरात फासकीत अडकून दुसऱ्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे वन्यजीव संरक्षण आणि सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून वन विभागाने सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मेघी गावकरवाडी येथील सुरेश करंबेळे यांच्या मालकीच्या विहिरीत एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. विहिरीत काहीतरी तरंगत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. तपासणीदरम्यान तो नर बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक पाहणीत बिबट्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असला तरी त्याचे दात, नख्या आणि इतर महत्त्वाचे अवयव सुरक्षित असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने त्याची हत्या झाल्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृतदेहाचे परीक्षण करण्यात आले असून त्यानंतर वन विभागाने नियमानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावली.
या घटनेची चर्चा सुरू असतानाच त्याच दिवशी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हारेकरवाडी परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. रस्त्यालगत खैराच्या झाडाला लावलेल्या फासकीत एक बिबट्या मृतावस्थेत अडकलेला आढळून आला. स्थानिकांनी याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
प्राथमिक तपासात फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असले, तरी तो फासका कोणत्या उद्देशाने लावण्यात आला होता, तो वन्यप्राण्यांसाठी होता की इतर प्राण्यांसाठी, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात मानवी हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नसल्याने वन विभागाने अधिक सतर्कता बाळगली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
एका दिवसात दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. संगमेश्वर तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून अन्न व पाण्याच्या शोधात ते अनेकदा मानवी वस्त्यांच्या जवळ येतात. अशा परिस्थितीत उघड्या विहिरी, फासकी आणि इतर धोके वन्यप्राण्यांसाठी जीवघेणे ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, परिसरात कोणताही वन्यप्राणी जखमी, अडचणीत किंवा संकटात आढळल्यास नागरिकांनी स्वतः हस्तक्षेप न करता तात्काळ वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













