रत्नागिरी : मुसळधार पावसाचा फटका, सप्तलिंगी-निवळी घाटात दरड कोसळली

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला आहे. सप्तलिंगी आणि निवळी घाट परिसरात डोंगराचा काही भाग कोसळून माती व दगड थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात आली असून वाहनांना सावकाश सोडले जात आहे.

banner 728x90

सततच्या पावसामुळे डोंगरावरील माती सैल झाल्याने दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या जीवित अथवा वित्तहानी झालेली नसली तरी परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाने या ठिकाणी तातडीने यंत्रणा तैनात करून दरड हटविण्याची गरज व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाऊस याच वेगाने सुरू राहिल्यास मोठी दरड कोसळून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांनी हवामान आणि रस्त्यावरील परिस्थितीची माहिती घेऊनच प्रवास करावा, असा सल्लाही देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *