राजापूर : रिक्षात हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचा मृत्यू

banner 468x60

राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे परिसरातील सर्वपरिचित आणि सेवाभावी रिक्षा व्यावसायिक ताजू वाडेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. विशेष म्हणजे प्रवासी सेवा करत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली गेल्याने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने गावासह प्रवासी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ताजू वाडेकर हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी घेऊन ओणीच्या दिशेने निघाले होते. प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने ते मार्गस्थ असतानाच अचानक त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. झटका इतका तीव्र होता की चालत्या रिक्षावरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात घबराट निर्माण झाली. मात्र सुदैवाने रिक्षामधील प्रवासी गंभीर जखमी झाले नाहीत.

घटनेची माहिती मिळताच ओणी परिसरातील स्थानिक रिक्षा व्यावसायिक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ताजू वाडेकर यांना तत्काळ ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेने उपस्थितांनाही मोठा धक्का बसला.

गोठणे दोनिवडे येथील रहिवासी असलेले ताजू वाडेकर हे अत्यंत कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. तरुणपणी त्यांनी परदेशात फ्रिज मेकॅनिक म्हणून काम केले होते. मात्र परदेशातील नोकरी आणि आर्थिक स्थैर्य असूनही त्यांना आपल्या गावाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. काही वर्षांपूर्वी त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आणि सुमो तसेच रिक्षा व्यवसायातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले.

व्यवसाय करताना त्यांनी केवळ प्रवासी वाहतूक केली नाही, तर माणुसकीची नातीही जपली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते लवकरच परिसरातील सर्वांचे लाडके बनले. नेहमी डोक्यावर उलटी टोपी घालण्याच्या त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे ते संपूर्ण पंचक्रोशीत “उलटी टोपी” या नावाने प्रसिद्ध झाले होते. गावातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते.

गोठणे दोनिवडे-राजापूर मार्गावर ते अनेक वर्षे रिक्षा व्यवसाय करत होते. या मार्गावरील अनेक शालेय विद्यार्थ्यांना ते मोफत सेवा देत असत. एखाद्या विद्यार्थ्याकडे पैसे नसले तरी त्यांना कधीच नकार दिला जात नसे. एखादा आजारी व्यक्ती असो, रात्री-अपरात्रीची वेळ असो किंवा अचानक आलेली अडचण असो, ताजू वाडेकर हे मदतीसाठी सदैव पुढे असायचे.

“प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा” ही भावना त्यांनी आयुष्यभर जपली. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंतही ते प्रवाशांची सेवा करत होते, ही बाब अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक रिक्षा व्यावसायिक नाही, तर माणुसकी जपणारा दिलदार माणूस हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मोठा चाहता वर्ग असून, त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *