रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्या सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणताही धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, चिपळूण येथील वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार ही सुट्टी अंगणवाड्यांपासून ते महाविद्यालयांपर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. यात सरकारी, खाजगी, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा तसेच व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभाग आणि शैक्षणिक संस्थांना आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनीही आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













