लांजा : जमिनीतील वादातून तिघांकडून तरुणाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी

banner 468x60

लांजा तालुक्यातील केळंबे माळवाडी येथे जमिनीच्या वादातून एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केळंबे येथील गट क्रमांक ९२ मधील जमिनीत घडली. याबाबत प्रसाद चंद्रशेखर जठार (वय ३६, रा. माळवाडी, केळंबे, ता. लांजा) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात विलास जयसिंग शेलार (वय ४५), शुभम चंद्रशेखर शेलार (वय २५) आणि ओम ऊर्फ घारू चंद्रशेखर शेलार (वय १९, सर्व रा. माळवाडी, केळंबे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी संबंधित जमिनीत कुंपणाचे काम करत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी सुरू असलेल्या कामाची विचारणा केली. याचा राग आल्याने तिन्ही आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर धाव घेतली. आरोपी विलास शेलार याने फिर्यादीची मान पकडली, तर शुभम शेलार याने त्यांचा हात पिरगळून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर विलास शेलार याने हातातील खताच्या झाडाचा ठोबा फिर्यादीच्या डोक्यात मारला. शुभम शेलार याने कमरेवर, तर ओम शेलार याने पाठीवर ठोबा मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच फिर्यादी तेथून निघून जात असताना आरोपींनी त्यांना ढकलत कुंपणाच्या गेटबाहेर काढले.

यावेळी आरोपी विलास शेलार याने “तू यापूर्वी वाचला आहेस, यापुढे तुला डंपरखाली चिरडून टाकीन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *