दापोली तालुक्यातील पिसई-विसापूर येथील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या मापोली-महाड मार्गावरील पिसई ते विसापूर रस्त्याच्या कामाविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियम डावलून सुरू असल्याचा आरोप करत स्वराज्य प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिष निंबकर, उपाध्यक्ष अजय कोळंबेकर आणि सचिव यतिन पेडणेकर यांनी येत्या १ जून २०२६ रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा देत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिसई ते विसापूर रस्त्याचे काम करताना कोणत्याही तांत्रिक निकषांचे पालन केले जात नसून संबंधित विभागाचे अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. मातीकामावर योग्य पद्धतीने खडीकरण, रोलर फिरविणे आणि आवश्यक प्रक्रिया न पाळताच काम सुरू असल्याने रस्त्याचा दर्जा धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच कामासाठी वापरण्यात येणारे पाणी टँकर चालकांकडे आवश्यक परवाने नसल्याचा आरोप करण्यात आला असून काही चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी करण्यात आलेले डायव्हर्शन अत्यंत अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याची लेव्हल समतोल नसल्यामुळे वाहनांच्या डिझेल टाक्या आणि इंजिनला धक्के बसत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची उंच-सखल पातळी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रस्त्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्व प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा १ जूनपासून उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











