लांजा : अवकाळी पावसाचा लांज्यात फटका, वीज पडून घरातील साहित्य जळाले

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील Lanja शहरातील आगरवाडी परिसरात ९ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. या दरम्यान वीज पडल्याने प्रभाकर शांताराम गुंड्ये यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, इन्व्हर्टर तसेच इलेक्ट्रिक मीटर जळून खाक झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

banner 728x90

या दुर्घटनेत अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तलाठी, नगरसेवक तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामा केला.

नुकसानग्रस्त प्रभाकर गुंड्ये यांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “सन १९९७ सालीही आमच्या घरावर अशाच प्रकारे वीज पडून मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.”

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे आणि वीज पडल्याच्या घटनेनंतर संपूर्ण Lanja शहरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. संबंधित वीज यंत्रणेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

याचबरोबर आगरवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, फणस आणि नारळ बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी आगरवाडी येथील ग्रामस्थांनीही विशेष पुढाकार घेतला. रस्त्यावर आणि वीजवाहिन्यांवर पडलेली झाडे व फांद्या हटवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः मेहनत घेत मार्ग मोकळा केला. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम अधिक वेगाने करता आल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *