रत्नागिरी : पोलीस दलाचा गौरव, 5 जणांची PSI पदी निवड, तीन वर्षांच्या मेहनतीला यश

banner 468x60

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या भरती प्रक्रियेत रत्नागिरी पोलीस दलातील पाच कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. राज्यभरातून तब्बल 615 पदांसाठी ही स्पर्धा पार पडली होती. अत्यंत कठीण व स्पर्धात्मक असलेल्या या परीक्षेत सलग तीन वर्षे जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेत अखेर त्यांनी यशाला गवसणी घातली.

banner 728x90

या यशस्वी उमेदवारांमध्ये अनमोल गाजरे (सध्या पुणे ग्रामीण येथे कार्यरत), मनोज कोरडे, महेंद्र तांदळे, महेश जगताप आणि आदेश मांजरे यांचा समावेश आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यासाची कास धरली आणि नियमित सराव, मार्गदर्शन व स्वअनुशासनाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवले.

विशेष म्हणजे, पोलीस सेवेत कार्यरत असताना अभ्यासासाठी वेळ काढणे हे मोठे आव्हान असते. मात्र या सर्वांनी कर्तव्य आणि अभ्यास यांचा योग्य समतोल साधत आपले ध्येय गाठले. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी पोलीस दलात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी तसेच कुटुंबीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुणांनाही स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळणार आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य नियोजन असल्यास यश निश्चित मिळते, हे या यशस्वी उमेदवारांनी सिद्ध करून दाखवले आहे.

नवीन जबाबदारी स्वीकारताना हे सर्व अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या सेवेत तत्पर राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *