आंजर्ले : रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आंजर्ले–मुर्डी ग्रामस्थांचा एल्गार, 8 मे रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा

banner 468x60

महावितरणमार्फत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामामुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले आणि मुर्डी गावांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, या दयनीय परिस्थितीविरोधात ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

banner 728x90


प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी, दिनांक ८ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून आंजर्ले खाडी पूल ते वाकडा आंबा परिसरात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
गावातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना रोजच्या प्रवासात प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


या संदर्भात ग्रामस्थांनी संबंधित विभागांना अनेक वेळा निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.


“जोपर्यंत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका आंजर्ले व मुर्डी ग्रामस्थांनी घेतली आहे. आंदोलनासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, दापोली यांना रीतसर निवेदन देण्यात आले आहे.
या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग येऊन रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाईल का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *