रत्नागिरी : आंबा घाट लूटप्रकरणी आणखी दोन आरोपी जेरबंद; एक फरार आरोपीचा शोध सुरू

banner 468x60

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दख्खन ते आंबा घाट परिसरात प्रथमेश दळवी यांची गाडी अडवून, त्यांना जबरदस्तीने खाली उतरवत चाकूचा धाक दाखवून २५ हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीविरुद्ध देवरुख पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी आणखी दोन आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. गुरुवारी पोलिसांनी फरहान रशिद मुल्ला (४२, कोकणनगर), प्रथमेश सचिन भाटकर (२४, गोळप), सर्वेश सुभाष किर (२२, सोमेश्वर किरबाग), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६, कुवारबांव) आणि भुषण बिपेंद्र सावंत (२६, मिर्या) या पाच संशयितांना तात्काळ अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यानंतर उर्वरित फरार आरोपींपैकी अरबाज मजीद बांगी (३१, मजगाव) आणि शार्दूल सुनील किर (२४, सोमेश्वर) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर या दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अद्याप एक आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये ९ एप्रिल रोजी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भट कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत उदय झावरे, प्रमोद वाघाटे, शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव आणि प्रशांत साळुंखे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *