खेड : धामणदिवीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात पेवेकर यांचे आमरण उपोषण; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

banner 468x60

खेड तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायतीतील विकासकामे तसेच Government e-Marketplace (GeM) खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेविरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर यांनी अखेर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून वारंवार दिल्या गेलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने त्यांनी मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी खेड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पेवेकर यांनी या प्रकरणी प्रथम १४ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृत तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये निधीचा गैरवापर झाल्याचा तसेच Government e-Marketplace (GeM) खरेदी प्रक्रियेत नियमबाह्य व्यवहार झाल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला होता. मात्र, तक्रार दाखल होऊनही दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी ३ मार्च २०२६ रोजीही उपोषणाचा इशारा देत आंदोलन छेडले होते.

त्या वेळी प्रशासनाने लेखी आश्वासन देत आठ दिवसांत सखोल चौकशी पूर्ण करून दोषारोपांसह अहवाल जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. यामुळे काही काळासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आली नाही.

पेवेकर यांच्या मते, प्रशासनाकडून दिलेल्या मुदतीनंतर सुमारे २० दिवस उलटूनही चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही, तसेच त्याची प्रत तक्रारदार म्हणून त्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची उघडपणे पायमल्ली केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय, मूळ तक्रारीला चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शासनाच्या नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये एका महिन्याच्या आत प्राथमिक चौकशी पूर्ण होऊन कारवाई अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप पेवेकर यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशासनाला ७ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत चौकशी अहवाल सादर करून संबंधितांकडून आर्थिक नुकसानाची वसुली करावी, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच प्रशासकीय कारवाई करावी, अशा ठोस मागण्या त्यांनी केल्या होत्या. मात्र, या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

सध्या पेवेकर यांचे उपोषण सुरू असून, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनामुळे धामणदिवी ग्रामपंचायतीतील कारभार आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, चौकशी अहवाल कधी सादर केला जातो आणि पेवेकर यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *