रत्नागिरी : 10 वीचा पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या, रत्नागिरीत हळहळ

banner 468x60

रत्नागिरी येथे दहावीच्या परीक्षा सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पेपर कठीण गेल्याच्या नैराश्यातून १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90 banner 728x90

अनुष्का अमित चिपरीकर (वय १६, रा. स्वामी नगर, खेडशी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी (११ मार्च) दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर ती आपल्या खोलीत गेली होती. मात्र बराच वेळ झाला तरी ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता अनुष्काने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. मृतदेहाची पाहणी करताना तिच्या डाव्या हातावर धारदार वस्तूने ओरखडल्याच्या खुणाही आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.

दहावीचा पेपर अपेक्षेप्रमाणे न गेल्याने किंवा कठीण गेल्याने अनुष्का तणावाखाली होती आणि त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

परीक्षा हा आयुष्याचा शेवट नसून अपयशावर मात करण्यासाठी कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रांनी विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे गरजेचे असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *