खेड : जगबुडी नदी अपघातात जखमी असलेल्या चालकाचा मृत्यू , पत्नीनंतर आता पतीचाही मृत्यू

banner 468x60

खेड मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीत कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले चालक परमेश रामकृष्ण पराडकर (52 रा. मिरा-भाईंदर, ठाणे) यांचेही सोमवारी सायंकाळी उशिरा उपचारादरम्यान निधन झाले.

banner 728x90 banner 728x90

दरम्यान, त्यांची पत्नी मेघा पराडकर आणि मुलगा सौरव पराडकर यांचा सोमवारी पहाटे अपघातात जागीच मृत्यू झाला होता.


पराडकर कुटुंबिय अतिशय मेहनती अन् मदतशील कुटुंब म्हणून नावारुपास आले होते. मात्र या कुटुंबावर नियतीने एकाचवेळी झडप घालत त्यांच्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला आहे. कर्ताधर्ता लेक, सून व नातवावर काळाने घाला घातल्याचा धक्का पचवता न आलेली परमेश यांची वृद्ध आईसुद्धा ‘कोमा’त गेली आहे.


चालक परमेश पराडकर हे आपल्या ताब्यातील किया कारमधून (एमएच 02 एफएक्स 3565) पत्नी मेघा व चिरंजीव सौरव पराडकर व मोरे कुटुंबातील विवेक श्रीराम मोरे त्यांची पत्नी मिताली, चिरंजीव निहार विवेक मोरे व त्यांचा भाचा श्रेयश राजेंद्र सावंत यांना घेऊन मिरारोड येथून कर्ली-देवरुख येथे मिताली मोरे यांचे वडील मोहन काशिराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी येत होते.


सोमवारी पहाटे 5.15 वाजताच्या सुमारास कार जगबुडी नदीपुलाच्या दोन्ही कठड्यांना धडक देत मोकळ्या भागातून नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात विवेक मोरे बालंबाल बचावले तर चालक परमेश पराडकर गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात नेत असताना चालक परमेश पराडकर यांचीही पनवेलनजीक प्राणज्योत मालवली.


पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या अपघातात मिताली मोरे, निहार मोरे, मेघा पराडकर, श्रेयस सावंत, सौरव पराडकर या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.


मिरा-भाईंदर येथे पत्नी व मुलासह वास्तव्यास असलेले परमेश पराडकर हे उत्कृष्ट चालक म्हणून परिसरात परिचित होते. मुंबईत ‘ओला-उबेर गाड्यांवर चालक म्हणून काम करत कुटुंबाचा रहाटगाडा हाकत होते. पण, जगबुडी पुलावर मृत्यूने त्यांची ‘वाट’ अडवली. दरम्यान, रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हलगर्जीपणासह वेगाने वाहन चालवत स्वतः सह अन्य पाच जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोमवारी सायंकाळी उशिरा मृतचालक परमेश पराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परमेश मुंबई परिसरात ओला-उबेर’ गाड्यांवर चालक म्हणून काम करत कुटुंबाचा डोलारा सांभाळत होते. तर दोन वर्षांपूर्वीच लेक सौरव बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागला होता. मेघा यासुद्धा कुटुंबाला हातभार लावताना नालासोपारा येथे पिझ्झा, बर्गरसारख्या खाद्यपदार्थांची विक्री करत होत्या.

अनेकांना जेवणाचे डबे देत होत्या.
खाद्यपदार्थांची हातगाडीही सुरू केली होती. यामुळे अनेकांशी त्यांचे स्नेहाचे नाते जोडले होते. नियतीने पराडकर कुटुंबातील तिघांवर झडप घालताना अनेकांचा हा मायेचा हात ही हिरावून नेला. निष्ठर नियतीने डाव साधत मोरे आणि पराडकर ही दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त केली. 6 जणांच्या अपघाती निधनाने मिरारोड-भाईंदर, नालासोपारा परिसर सुन्न झाला आहे.
मिरारोड-भाईंदर येथे वास्तव्यास जाण्यापूर्वी परमेश पराडकर हे रायगड जिह्यातील पोलादपूर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. अल्पावधीतच ते सर्वोत्कृष्ट आचारी म्हणून नावारुपास आले होते. बाबू भैया या नावानेच अनेकजण त्यांना संबोधत होते. चार ते पाच वर्षे येथे आचारी म्हणून काम केल्यानंतर कुटुंबियांसह मिरारोड-मुंबई येथे वास्तव्यास गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *