खेड : तालुक्यातील रजवेल मोहल्ल्यात भीषण आग, 25 जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकाचे लाखोंचे नुकसान

banner 468x60

खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज 18 जून पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे आगीत होरपळून दगावली असून दोन म्हशींना जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संबंधित पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे ५ वाजून १० मिनिटांच्या सुमारास रजवेल मोहल्ला येथील गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोठ्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे गोठ्यात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी वेळ मिळू शकला नाही.

घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आसपासच्या परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

मात्र, तोपर्यंत गोठ्यातील १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला होता. दोन म्हशींना मात्र वेळेत बाहेर काढून वाचविण्यात यश मिळाले. मृत झालेल्या जनावरांची आर्थिक किंमत लक्षात घेता पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून शॉर्टसर्किट, विजेची ठिणगी किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

दरम्यान, एका क्षणात अनेक जनावरे गमावल्याने पशुपालक कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. या हृदयद्रावक घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *