तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या हालचालींना पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामपंचायत गोवळ कार्यक्षेत्रातील गोवळ, वरचीवाडी आणि खालचीवाडी येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करून संभाव्य अणुऊर्जा प्रकल्पासह कोणत्याही विनाशकारी प्रकल्पाच्या उभारणीस विरोध दर्शविला आहे.

राजापूर तहसीलदारांना पाठविण्यात आलेल्या पत्राद्वारे ग्रामपंचायत गोवळने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तहसील कार्यालयाकडून मौजे बारसू, सोलगाव, वरचीवाडी आणि खालचीवाडी परिसरातील जमिनी अणुऊर्जा प्रकल्पासाठी कमाल मर्यादेपेक्षा अधिक क्षेत्र धारण करण्यास तत्त्वतः मान्यता देण्याबाबत पत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामसभेने यावर सविस्तर चर्चा केली होती. २२ जून २०२६ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत ठराव क्रमांक १ एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गोवळ, वरचीवाडी आणि खालचीवाडी येथील ग्रामस्थांचा संभाव्य अणुऊर्जा प्रकल्पाला तसेच कोणत्याही पर्यावरण आणि स्थानिक जीवनमानावर परिणाम करणाऱ्या प्रकल्पांना ठाम विरोध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, अणुऊर्जा प्रकल्पासाठी कमाल मर्यादेपेक्षा अधिक क्षेत्र धारण करण्याच्या प्रक्रियेलाही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामपंचायतीने तहसील प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनात स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांच्या भावना विचारात घेऊन या विरोधाची अधिकृत नोंद घेण्याची मागणी केली आहे.

बारसू परिसरातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांचा विरोध अद्याप कायम असल्याचे या ठरावामुळे पुन्हा अधोरेखित झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













