गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

banner 468x60

गुहागर तालुक्यातील भातगाव गोळेवाडी येथील अनंत विठ्ठल वीर (वय ५५) या व्यक्तीचा रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अनंत वीर यांना तीव्र छातीदुखीचा त्रास सुरू झाला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. सकाळी ११.५१ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले होते.

मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्याच दिवशी सकाळी १०.१० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बगड यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची नोंद २० फेब्रुवारी रोजी गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद क्रमांक ०७/२०२६ नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे भातगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *