मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईत, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसमधून या दोन्ही मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षितपणे मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले.
मिळालेल्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक विशेष पथक तातडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रवाना झाले.
नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर येताच पोलिसांनी रेल्वेच्या डब्यांची कसून तपासणी केली. यावेळी त्या दोन्ही अपहृत मुली पोलिसांना मिळून आल्या. ही कारवाई पूर्णपणे गोपनीय आणि वेगाने करण्यात आल्याने मुलींची सुरक्षित सुटका करणे शक्य झाले.
मुलींची सुटका केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना वाकोला पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यामुळे अपहृत मुलींच्या पालकांनी आणि मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय आंबेकर, पोहेकॉ दिपराज पाटील मपोहेकॉ स्वाती राणे या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















